आपले सरदार, विशेषतः पंतप्रधान आपल्या आज्ञेत
आहेत का नाही याची एक दिवस परिक्षा घ्यावी असे वाटून थोरल्या शाहू महाराजांनी
नानासाहेबांना दहा हजार फौज घेऊन सातार्यात भेटीला बोलावले. महाराजांचा हुकूम आला
महणून नानासाहेबही हातातली कामे टाकून ताबडतोब सातारा मुक्कामी येण्यास निघाले.
नानासाहेब खरंच फौजेनिशी येत आहेत हे पाहून शाहूराजांनी पुन्हा प्रश्न केला की “पंतप्रधान इतकी फौज घेऊन कशाकरीता
येत आहेत ?”..
नानासाहेबांना
हे समजले ! महाराजांनीच आपल्याला फौजेनिशी बोलवले खरे पण आता महाराज विचारतायत एवढी
फौज कशाला ! म्हणून नानासाहेब राजाज्ञा म्हणून आणलेली सारी फौज दहा कोसांवर (३२
किमी) वर ठेवून केवळ पाच खिजमतगारांसह सातार्यात दाखल झाले. इकडे नानासाहेब
सातार्यात आले हे पाहताच भेट घेण्याऐवजी शाहू महाराज शिकारीकरीता बाहेर पडले आणि
एका पाणवठ्यापाशी मासे पकडण्याकरीता गळ टाकून बसले ! नानासाहेबांना महाराज शिकारीस
गेल्याचे समजल्याने ते सुद्धा महाराजांच्या मागोमाग तेथे येऊन पोहोचलेच..
नानासाहेब
महाराजांच्या मागे जाऊन उभे राहीले. इतर भालदार चोपदारांनी श्रीमंत खासा स्वारी
पंतप्रधान आल्याचे पाहताच पटापट मुजरे केले. शाहू महाराजांना भालदार-चोपदारांच्या
हालचालीवरून मागे नानासाहेब आल्याचे समजले, पण तसे न दाखवता त्यांनी एक प्रहरापर्यंत
पेशव्यांकडे पाहिलेही नाही आणि आपल्या इतर सेवकांशी शिकारी संबंधीच बोलणे सुरु
ठेवले ! अखेरीस प्रहरभरानंतर नानासाहेब कंटाळून गेले असतील असे वाटून शाहूराजांनी
मागे पाहिले तरी तेव्हाही नानासाहेब त्याच जागी आज्ञेची वाट पाहत उभे होते.
शाहूराजांनी काही न बोलता नानासाहेबांना विडे देऊन डेर्यात जायला सांगितले.
काही काळानंतर
सातार्यात आल्यावर पंतप्रधान दरबारात गेले असता महाराज काही न बोलता सिंहासनावरून
उठून जोडे घालून थेट उठून वाड्याच्या रोखाने चालू लागले. मध्यावरच शाहूराजांनी
जोडे काढून टाकले आणि ते तसेच पुढे निघाले. जवळपास खिजमादगार कोणीही नव्हते.
नानासाहेब मागून हे सारे पाहत होतेच. त्यांनी महाराजांचे ते जोडे स्वतःच्या हाताने
उचलले आणि दिवाणखान्यात घेऊन गेले. शाहू महाराज हे सारे जाणवू न देता पाहत होतेच.
नानासाहेबांच्या या कृतिमूळे शाहूराजांना समाधान वाटून त्यांनी नानासाहेबांशी
कामकाजाच्या चार गोष्टी करून त्यांना निरोप दिला.
काही काळ लोटला
आणि पंतप्रधान नानासाहेब पाच-सात हजार घोडेस्वारांनिशी एका मोहीमेवरून थेट सातार्यात
आले. आणि अचानकच, शाहूराजांनी
चिटणीसांना बोलवून “प्रधान यांस
चिठी लिहावी जे, तुमचे प्रधानपद
दूर केले आहे. तरी शिक्के कटार व जरीपटका हुजुरे पाठविले यांजबरोबर जामदारखान्यात
दाखल करणे” असही आज्ञा
केली ! नानासाहेबांचा मुक्काम वेण्णा नदीच्या काठावर होता. चिटणीसांनी
राजाज्ञेबरहुकूम नानासाहेबांकडे चिठ्ठी देऊन दोन खिजमदगार पाठवले. ते हुजुरे
नानासाहेबांपाशी आले आणि ती चिठ्ठी जशीच्या तशी पेशव्यांना दिली. नानासाहेबांनी
चिठ्ठी वाचली. खिजमदगारांना वाटले आता नानासाहेब आता चिडूनचिठ्ठी फाडून फेकूनच
देतील. पण प्रधानपंतांनी मात्र चिठ्ठी वाचून झाल्यावर त्या चिठ्ठीला चक्क मुजरा
केला, आणि तसेच आत
उठून जाअऊन शिक्के-कट्यार आणि जरिपटका त्या हुजुर्यांच्या हवाली केला. आता
नानासाहेब अधिकृतरीत्या पेशवे नव्हते ! त्यांनी आपली एक राहुटी आपल्या खाजगी
नोकरांसह लष्करापासून दूर उभारली आणि शाहू महाराजांना चिठ्ठी लिहीली की, “आपली आज्ञा झाली तेव्हाच आपल्या
पायांपाशी सेवएस येणार होतो पण सोबत हा प्रधानकीचा सरंजाम आहे, तो सगळा कोणाकडे सोपवावा याची आज्ञा
व्हावी, म्हणजे तो सारा
सरंजाम, कारखाने आणि
फौज सोपवून नंतर पायांपाशी येतो” ! हाच निरोप तोंडी सांगणयाकरीता नानासाहेबांनी सेवकांनाही बजावले. ते
हुजुरे शिक्के-कट्यार आणि जरीपटका घेऊन महाराजांपाशी आले. महाराजांनी ते
जामदारखान्यात जमा कारवून हुजुर्यांकरवी नानासाहेबांना पुन्हा निरोप पाठवला की, “तो सारा सरंजाम ताब्यात घेण्यास
सरकारातून कारकून येतील तोवर तेथेच रहावे”.
अशातच दहा दिवस
लोटले. महाराजांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली.
नानासाहेबांच्या विश्वासातल्या पुरंदरे, साचिव वगैरे लोकांनी आणइइतरहीकाही
मुत्सद्द्यांनी शाहू महाराजांना विनवले की, “पंतप्रधानांकडून अशी काय आगळीक घडली की त्यांना
दूर करावे?” यावर
शाहूमहाराज म्हणाले, “त्यांच्याकडे
प्रधानपद ठेवायचे नाही, ते पूर्वीप्रमाणे
पिंगळ्यांनाच द्यायचे आहे”. यावर
मुत्सद्द्यांचे म्हणणे पडले की मग निर्णय लवकर घ्यावा, हिंदुस्थानात ही बातमी पसरली तर
शत्रू या गोष्टीचा फायदा घेईल नक्कीच ! इकडे दहा दिवस नानासाहेब आपल्या खासगत
माणसांनिशी राहुटीत आज्ञेची वाट बघत होते. अखेरीस त्यांनी मंत्री आणि चिटणीस
यांच्याकरवी शाहूराजांकडे विनंती केली की, “मी लष्कराच्याबाहेर राहिलो आहे. येथे वेळ
घालवण्यापेक्षा मला आपल्या चरणांशी येऊन सेवा करण्याची आज्ञा व्हावी”. यावर शाहूराजांनी विचारले की इथे
येण्यासाठी नजर काय कराल, नजराणा काय
द्याल ? यावर
नानासाहेबांनी उत्तर दिले की, “मी एकटा आहे, सरंजाम
सरकारातच जमा केलेला आहे. घर वगैरे सगळं जे आहे ते सरकारातच जमा आहे”. यावर शाहूराजांनी काहीही प्रत्युत्तर
केले नाही.
एके दिवशी
शाहूराजांनी हुजुरे पाठवून नानासाहेबांना भेटीस बोलावणे पाठवले. नानासाहेब त्यांना
पेशवेपदावरून दूर केल्याने आता भयंकर चिडले असतील आणि भेटीला आल्यानंतर ते आपली
अवज्ञा करतील वगैरे शाहूमहाराजांच्या मनात आले असावे. नानासाहेब केवळ एकाच
सेवकानिशी येऊन उभे राहीले आणि शाहूराजांना मुजरा करून म्हणाले, “मी आपला सर्वस्वी अपराधी आहे.
पायांपाशी कोणतीही सेवा सांगावी, नि:संकोच करीन, पण या पायांपासून दूर करू नये”. हे ऐकताच शाहूराजांना मनोमन आनंद
झाला आणि खात्री पटली, की हे एकनिष्ठ
सेवक खरे, यांच्यापासून
आपल्या आणि राज्याच्या सेवेत कधिही अंतर पडायचे नाही ! आणि म्हणून महाराजांनी लगेच
चिटणीसांकरवी महाराजांनी प्रधानकीची वस्त्रे, शिक्के-कट्यार आणि जरिपटका आणवून पुन्हा पेशवेपद
बहाल केले. नानासाहेबांनी कृतज्ञतेने शाहूराजांच्या पायावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांना हाताने धरून उठवत
शाहू महाराज भर दरबारात कौतुकाने म्हणाले, “तुमची निष्ठा कशी आहे हे पाहिले ! तुम्ही
बाजीरावांचे पुत्र आणि बाळाजी विश्वनाथ यांचे नातू खरंच शोभता ! तुमची सेवा आणि
निष्ठा पाहून खुप खुप आनंद होत आहे”.. आणि महाराजांनी भर दरबारात श्रीमंत पंतप्रधान
नानासाहेबांचा कौतुकाने आणि समाधानाने यथोचित सन्मान केला !
स्रोत : मल्हार रामराव कृत थोरल्या शाहू महाराजांची बखर
© कौस्तुभ कस्तुरे